मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, February 8, 2021

यज्ञ, समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य --लेखक- डॉ. प्रमोद प्र. मोघे

यज्ञ 

 लेखक-  डॉ. प्रमोद प्र. मोघे (निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ, NCL)


यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे. सर्वसामान्य जनतेने ते अंगिकारले म्हणून यज्ञ हा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते, निसर्गाने जे जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेत आपल्याला सांगितल्या आहेत. आपला जन्म ते मृत्यु ह्या प्रवासात्त त्या समाविष्ट केलेल्या आहेत व त्याकरता अनेक उपक्रम पण शोधले गेले आहेत. उदा. जन्मानंतर नक्षत्रशांत वा आयुष्यहोम हा यज्ञ वा होम मुलाच्या जन्मापासून ते पुढील आयुष्यप्रवास निरोगी व्हावा ह्याकरता करण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर धन्वंतरी होम, मृत्युंजय होम हे ही चांगल्या प्रकृतीसाठी, दीर्घायुष्यासाठी करतात. मग मुंजीत, लग्नात, मुलीसाठी लज्जाहोम, घरासाठी वास्तूशांत इ. करण्यास सांगितले आहेत.

पण हे झाले छोटे यज्ञ.समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रुद्रयाग, पर्यावरणासाठी सोमयाग, पर्जन्ययाग ह्यासाठी प्रसंगारूप मोठे यज्ञ केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्निकुंड बऱ्याच भूमिती आकृतीत वापरले जाते. पूर्वी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून अग्नीप्रज्वलित करत असत. त्या अग्नीत औषधी तत्त्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, सालीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, मंदार, देवदार इ. वृक्षांच्या खाली पडलेल्या कांड्या, दुर्वा हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. ह्या आहुत्या देताना मंत्रोपचार विशिष्ट स्वरात म्हणतच त्याचे हवन केले जाते. यज्ञ लहान असल्यास 3 ते 4 तासाचा अवधी व मोठा यज्ञपूर्ण करण्यास 3 ते 7 दिवस अवधी लागतो.आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्या जगात ह्यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञ विधी आहे याचा आम्ही शोध घेतला असता 'अग्निहोत्र'ह्या यज्ञविधीने आमचे लक्ष्य वेधले. सर्व यज्ञात जागा, मनुष्यबळ, वेळकाळ, भरपूर यज्ञसामुग्री त्यामुळे खर्च, लागणारा पैसा इ. गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. ह्या सर्व यज्ञात मनःशांती, आरोग्य, पर्यावरण रक्षण होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला तेच सर्व उद्देश "अग्निहोत्र'ने सुद्धा लाभू शकतात हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिध्द करण्याचे काम आम्ही गेले 5-6 वर्षे करत आहोत. त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यापर्यंत देण्यासाठी हा लेखनप्रपंच ह्या लेखाद्वारे मी करत आहे.

"अग्निहोत्र' हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतला एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे जो सामान्यातल्या सामान्य माणूस सहज करू शकतो. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी 10 मिनिटात करता येतो.ह्या यज्ञाला जास्तीत जास्त रु. 3/- ते रु. 5/- इतका खर्च येतो.अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळाउपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत.अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र२. गाईच्या दुधाचे शुद्ध तूप २-३ चमचे३. गाईच्या शेणाच्या गोवर्या ४-५ तुकडे४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे ४-५ ग्रॅमसूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात. सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम्नमम || हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे.अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. तो भाग म्हणजे पुण्यातील रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ. अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी परिसरातील हवेच्या विश्लेषणाचे पूर्वमापन करण्यात आले. 

अग्निहोत्र प्रयोगाची खालील उदिष्ट्ये ठरवण्यात आली...१. अग्निहोत्रामुळे होणारे आकाश व उष्णता उर्जेतील बदल२. अग्निहोत्र धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम३. अग्निहोत्र धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम४. अग्निहोत्र धूर व राखेचा रोपांच्या/ बी, बियाण वाढीवर होणारा परिणाम५. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म६. अग्निहोत्र राखेने पाणी शुद्धीकरण.हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले ज्यामध्ये शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेऊन उत्तम साथ दिली.माझ्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाकरता फग्युर्सन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची, तेथील विद्यार्थ्यांची, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत घेण्यात आली व त्यासाठी प्रज्ञा विकास मंचाच्या 'फ्रॉस्ट' ह्या संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले. सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अग्निहोत्राने प्रकाश उर्जेतील बदल हा लक्स मीटरच्या साह्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूची संख्या मोजण्यात आली त्यामुळे जवळजवळ 90% सूक्ष्मजंतूची वाढ अग्निहोत्राने थांबत असल्याचे सिद्ध झाले.प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले.रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवण्यात आल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात होते हे आढळून आले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हे ही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.अवघ्या रु. ३/- ते ५/- खर्चात रोज फक्त १० मिनिटे सकाळी वा संध्याकाळी हा अग्निहोत्र विधी करून आपण वरील सर्व फायदे मिळवू शकतो. प्रत्येक घर प्रदूषणविरहीत, जंतू विरहीत करू शकतो, शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो- हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून, जागतिक वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध करू शकलो व जगात आपल्या पूर्वपारंपारिक विज्ञानाला मानाचे स्थान देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.ह्यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणावर वेदात वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी "मिनरल वॉटर" इतकं शुद्ध करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच पण त्याकरता सर्वानीच आपल्या ज्ञानावर बौद्धिक गुलामगिरी नबाळगता विश्वास ठेवणे आवश्यक आहे. 

ह्या अभ्यासा दरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, पोलंड, झेकस्कलोकोव्हीया, जपान, सिंगापूर, पेरू, स्विझर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी ह्यावरील शेतीला Home Farming Technique असे नावही दिले आहे.दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानातील अणुशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, विमानशास्त्र, धातूशास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदीत केलेल्या देशांतील शास्त्रज्ञांनी करून घेऊन त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली आपला झोपी गेलेल्या, गुलामगिरी मानसिकतेच्या शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत.परवाच महालक्ष्मी मूर्तीवरती मूर्ती संवर्धनासाठी कोल्हापूरी लेप चढवण्यात आला. तो लेप आपल्या पूर्वजांनी 'वज्रलेप' म्हणून २००० वर्षापूर्वी तयार केला होता- तोच आपल्या शास्त्रज्ञांनी वापरला आहे. नुकतेच ह्याच महिन्यात इंग्लंडस्थित 'पॅनगयिया' ह्या कंपनीने आपल्या पारंपारिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या करताआपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला.आपल्याच वैभवशाही प्राचीन विज्ञानावर आपल्या शास्त्रज्ञांचा विश्वास नसल्याने तेच ज्ञान गोर्या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य धन्य म्हणणारे मग स्वीकारणारे असे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण 'कथिलाचा वाळा' हाती बाळगून आहोत असे खेदाने म्हणावे लागते.

डॉ. प्रमोद प्र. मोघे (निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ, NCL) यांचा लेख आहे

Monday, January 25, 2021

LM article by Manoj Govindwar of Jalgaon

 












शिक्षण व्यवस्था -- नवे सहस्त्रक उजाडत असतांनाच

 

शिक्षण व्यवस्था

नवे सहस्त्रक उजाडत असतांनाच

देशातील समाज व्यवस्था बिघडली आहे हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज उरलेली नाही. या बिघाडांचे पाढेही खूपदा वाचले गेले आहेत. भरमसाठ फुगलेली आणि फुगत चाललेली जनसंख्या, वाढत चाललेली भीषण आर्थिक विषमता, भ्रष्टाचार, जात - प्रांत - धर्म भाषा यातून वाढत चाललेली दुफळी आणि समाजमनाचे विभाजन, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे देशातील आर्थिक आणि राजकीय व्यवहारांभोवती आवळत चाललेले पाश, शिक्षणाक्षेत्रात व्यापून उरलेले अभाव आणि त्यातून निर्माण होणारी निरक्षरता, प्रचंड बोकाललेला चंगळवाद, कुप्रशासन, ब्रेनड्रेन इत्यादी काही ठळक उदाहरण सांगता येतील.

या सर्वात काही बदल घडवायचा असेल तर तो आपणच करायचा आहे आणि तो शिक्षणाच्या माध्यमानेच होऊ शकतो. पण त्यासाठी आताचे शिक्षण आणि शिक्षणतंत्र दोन्ही कुचकामी ठरलेले आहेत. त्यामधे बदल होणे नितांत गरजेचे आहे.

शिक्षण म्हणजे काय आणि कशासाठी ?

शिक्षण ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि श्वास चालतो तोपर्यंत ती चालूच राहतो. पण आपण शिक्षण म्हणतो तेव्हा ते शाळा - कॉलेजातून मिळालेल्या, किंबहूना कुणीतरी जाणीवपूर्वक दिलेल्या शिक्षणाचा विचार करीत असतो.. ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता यावे म्हणून समाजाने आणि प्रशासनाने केलेली व्यवस्था म्हणजेच शिक्षण- व्यवस्था.

कशासाठी शिक्षण या प्रश्नाचा विचार दोन बाजूंनी करावा लागेल. प्रत्यक्ष जी व्यक्ति शिक्षण घेत असते. तिला यातून काय मिळणार आहे आणि ज्या समाजाने ही शिक्षण-व्यवस्था निर्माण केली, ज्या समाजामधे त्या व्यक्तिला पुढेही रहायचं आहे, त्या समाजाला काय मिळणार आहे.

व्यक्तिगत उद्दिष्ट - शिक्षण घेण्याने शिक्षण घेणाऱ्याला काय मिळाले पाहिजे ? सर्वप्रथम शिकणे म्हणजे काय? कसे शिकायचे, कुणीहीकडून पटकन ज्ञान कसे घ्यायचे हे कळायला हवे.. शिक्षण व्यवस्थेबाहेरच्या जगातील ज्ञान कसे हस्तगत करायचे ही दृष्टि आली पाहिजे. चौकस बुद्धि निर्माण झाली पाहिजे. शिकण्याची आस लागली पाहिजे, त्याची गोडी आवड, लागली पाहिजे. शिकण्याविषयी, निरनिराळ्या विषयांबाबत मनात औत्सुक्य, आसुसलेपणा आणि शिकून घेण्याची हातोटी निर्माण झाली पाहिजे. थोडक्यातं शिकण हा छंद झाला पाहिजे. शिक्षणातून शिकण्याचा छंद जडला पाहिजे

दुसरे उद्दिष्ट -- देह टिकवण्यासाठी पोटाला भाजी भाकरी मिळालीच पाहिजे. ती कमवण्याची पात्रता शिक्षणातून मिळायला हवी . ती नेमकी पात्रता येत नसल्याने आजचे शिक्षण कुचकामी वाटते. तशीच ही पात्रता वर्षानुवर्ष शिक्षणात घालवता लौकरात लौकर निर्माण झाली पाहिजे. इतर कशालाही वेळ लागला तरी पोटार्थी शिक्षण कमीत कमी वेळात मिळाला पाहिजे.

शिक्षणाने भाजी - भाकरी कमावण्याची पात्रता यायला पाहिजे. जगाचा रामरगाडा चालतो आणि विकास पावतो. तो कौशल्याच्या आधारवर. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त होतात ते अंगभूत कौशल्याच्या बळावर .

शिक्षणातून कौशल्य , कार्यकुशलता निर्माण झाली पाहिजे.

शिक्षणाची सुरुवात म्हणजे सत्याची जाणीव. खर काय आणि खोट काय हे जाणूनच आणि खऱ्याच्या बाजूने निर्णय घेऊनच पुढचे पाऊल टाकता येते - पुढचा जीवनक्रम चालवता येतो. सत्याची आच, सत्यनिष्ठा , निर्माण होण हे फक्त चांगल्या य़ोग्य शिक्षणानेच घडू शकत. किंबहूना ते घडवू शकत नसेल तर शिक्षण नाहीच. सत्याचा वेध घेण्यासाठी बुद्धि, मेधा, धृति प्रज्ञा या चारी प्रवृत्तिंची जोपासना झाली पाहिजे.

शिक्षणातून सत्यनिष्ठा यायला पाहिजे.

माणसाच्या जीवनात उपभोग बा अनिवार्य आहे. संपूर्ण जीवन धारणा उपभोगावर तोलून राहिलेली आहे. श्वास घेणे, भाजी - भाकरी खआणे हाही उपभोगचे आहे. असे असूनही उपभोग्य वस्तूंची निर्मिती देखील मानवी श्रमातून होत असते हे ही तितकच खर. म्हणूनच

शिक्षणाने श्रमनिष्ठा शिकवली पाहिजे.

स्वतःच्या श्रमातून केलेल्या निर्मिती पुरताच उपभोगण्याचा हक्क आपला आहे. इतरांच्या श्रमातून झालेल्या निर्मिती उपभोगण्याचा हक्क आपली नाही., हे सत्य मनावर बिंबले पाहिजे. यासाठी संतोष संयम पण यायला हवे.

श्रमातून निर्माण झालेली निर्मिती टिकवून कशी धरता येईल, वाया जाणार नाही, याची खबरदारी जबाबदारी पेलता आली पाहिजे.

उपभोगासाठी आवश्यक ती कलासत्यी शिक्षणातून आली पाहिजे.

श्रमाइतकीच निर्मितीसाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे अन्वेषणा. श्रम आणि उपभोग हे कुठल्याही सजीव प्राण्याला आवश्यक असे त्याचे उपजत गुण आहेत. माणसाला मात्र अन्वेषणा, अविष्कार , शोध यासाठी लागणारी वेगळी बुद्धि मिळाली आहे. त्या अन्वेषक वृत्तिची, वैज्ञानिक वृत्तिची, पुढे काय ततः किम् हे विचारण्याची सव., आणि पात्रता हीच माणसाचे माणूसपण .

शिक्षणाने वैज्ञानिक, चौकस,प्रश्नवाचक, अन्वेषक प्रतिभेचा विकास झाला पाहिजे.

माणसाची सहज अंतः प्रेरणा म्हणजे करूणा. दुसऱ्याचे सुखदुःख वाटून घेण्याची वृत्ति. दुसऱयाच्या दुःखावर फुंकर घालण्याची वृत्ति. हे माणूसपण शिकणही आवश्यक.

शिक्षणामुळे परदुखाःत समरसतेची वृत्ति आली पाहिजे. माणूस समाजात रहातो, समाजाकडून लखमोलाच शिक्षण घेतो. त्या समाजाच ऋण मानल पाहिजे. समाजातील आईवडील, शिक्षण यांच्या उपकाराची जाणीव ठेवली, गेली पाहिजे.

शिक्षणामुळे कृतज्ञता आली पाहिजे. समाजगत उद्दिष्ट आली पाहिजे. समाजगत उद्दिष्ट - ज्या समाजात आपण रहातो, त्याचे उपकार नुसते स्मरुन भागत नाही. ते दसपटीने परत फेडता आले पाहिजेत.

समाज टिकवण्यासाठी, एकसंध रहाण्यासाठी, त्याच्या विकास होण्यासाठी, नवीन येण्याऱ्या पिढ्यांचे जीवन जास्तीत जास्त संपुष्ट होण्यासाठी आपले हातभार लागले पाहिजेत. सामाजिक शांति टिकवली गेली पाहिजे. समाजाला योग्य ती दिशा आणि वळण मिळाल पाहिजे - देता आल पाहिजे. म्हणूनच शिक्षणाच्या समाजगत उद्दिष्टांची यादी मी येणेप्रमाणे करते -

  • शिक्षणमुळे सामाजिक ऋणांची जाणीव निर्माण होऊन त्यांची दसपट परतफेड करता आली पाहिजे.

  • शिक्षणामुळे त्याग, राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी बलिदान या भावनांची जाणीव आणि जागृति झाली पाहिजे.

  • सामाजिक शांति, समवेदना आणि समसरता टिकवण्याची हातोटी आली पाहिजे.

  • समाजाला प्रसंगी दिशा देण्यासाठी कधी नेतृत्वाची आघाडी तर कधी पिछाडीही सांभाळता आली पाहिजे.

  • समाजाला टिकवून धरण्याची कला, त्यासाठी आवश्यक ते नियम कानून घालून देणे, त्यांचा सांभाळ करणे, प्रसंगी ते बदलता येणे, प्रशासन चालवणे यासारख्या योग्यता यायला पाहिजेत.

हे सगळ कस होणार ?

एका शिक्षणातून हे सगळ कस होणार हा प्रश्न कुणालाही पडेल. आजच्या शिक्षण व्यवस्थेत तर यातले किती उद्देश साध्य होतात हे पहाण्यासाठी मायक्रोस्कोपच हाती घ्यावा लागेल. पण येणाऱ्या नवनवीन पिढ्यांना अस शिक्षण मिळायच असेल तर अशी शिक्षण व्यवस्था नव्याने निर्माण करावी लागेल. सध्याची शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल. ते करताना दोन गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. आताच्या शिक्षण व्यवस्थेतल्या काही गोष्टी समूळ उपटून टाकून तिथे काही तरी नवीन घडवून आणून बसवान लागेल. काही गोष्टी तशाच ठेऊन, किंवा थोड्या प्रयत्नाने सुधारून त्यांच्या चातुर्याने वापर करून घ्यावा लागेल. अशी नवीन व्यवस्था तयार करण्यासाठी आपल्या हाती काय साधन सामुग्री आहे आणि ती अपुरी असेल ( नव्हे असणारच ) तर पूरक साधन सामुग्री कुठून आणायची तसेच हाती असलेल्या साधन सामुग्रीचा वापर कसा करायचा याचाही विचार करावा लागेल. नवीन बदलांची योजना करताना हे बदल नेमके कशासाठी कसे असतील हेही तपासून बघावे लागेल. हे बदल पाच- सहा प्रकाराने असतील.

शिक्षणाचा कालक्रम कमी करावा .

सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्याची किती वर्षे जातात- दहा, बारा, पंधरा, सतरा, वीस, बावीस, पंचवीस... अशी चढती भाजणी आहे. दुसरीकडे निरक्षरतेचे प्रमाण भरमसाठ वाढत चालले आहे. सन २००० चे अनुमानित आकडे सांगतात की साक्षरतेचे प्रमाण साठ टक्क्यांच्या आसपास आहे. शंभर कोटींच्या देशांत चाळीस कोटी मनुष्यबळ निरक्षर आहे. त्यातही स्त्रिया, ग्रामीण स्त्रिया, शहरातील गलिच्छ वस्तीतील स्त्रिया, मागासवर्गीय जाती, आदिवासी, भटक्या जमाती, तर काही मागास राहिलेली बिहार सारखी राज्य, किंवा अरूणाचल प्रदेश सारखी दुर्गम राज्य, फार काय प्रत्यक्ष पुण्यासारख्या विद्येच माहेरघर म्हणवणाऱ्या स्थानाजवळील मावळ , मुळशी , वेल्हे, आंबेगाव यातील दुर्गम गावांमधे निरक्षरता फार मोठ्या प्रमाणावर आहे. दुमका या बिहार जिल्ह्यांत महिला साक्षरता फक्त दोन टक्के आहे. यावरून आपल्याला " सर्वांना प्राथमिक शिक्षण" हा महत्वाचा टप्पा गाठायला देखील किती प्रयास पडणार आहेत याची कल्पना येते. एका व्यक्तीला साक्षर करण्यासाठी लागणारे श्रम, वेळ, उत्साह, कल्पकता आणि साहित्य या सगळ्यांची गोळा बेरीज करून त्याची किंमत जर हजार रूपये ठरवली तर फक्त निरक्षरता दूर करण्यासाठी येणारा खर्च चाळीस हजार कोटी रूपये असेल. त्यातून प्रत्येक नव्याने जन्माला येणाऱ्या बालकाला पुढे मागे साक्षर करावेच लागणार ही गरज ओळखली तर पुढे लागणाऱ्या खर्चाचा अँदाज येईल. सध्या देशांत दरवर्षी नव्याने सुमारे दहा लाख बालक जन्माला येतात. म्हणजे दरवर्षी फक्त साक्षरतेपोटी करावा लागणारा खर्च शंभर कोटींचा असणार आहे. मात्र या दहा लक्ष बालकांचा पहिलीच्या वर्गातील एकूण वर्षभराचा खर्च शंभर कोटींपेक्षा कितीतरी जास्त असेल हेही लक्षांत ठेवणे गरजेचे आहे.